अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तरुणाचा जामीन अर्ज फेटाळला

रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप असलेल्या संशयिताचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. तौसिफ आसिफ मिरजकर (36, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी तौसिफ याच्यासह तिघाजणांना अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली होती.

रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला. सरकार पक्षाकडून ऍड. अनिरूद्ध फणसेकर यांनी काम पाहिले. गुन्ह्यातील माहितीनुसार, रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरात अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 14 मे 2023 रोजी दोनच्या दरम्यान रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार हे रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथील पार्सल गेटमधून पार्किंगकडे जाणाऱ्या रोडवर पेट्रोलिंग करीत जात असताना काही इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना आढळले.

या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्याकडे घटनास्थळी एकूण 21.78 ग्रॅम ब्राऊन हेरॉईन हा अंमलीसदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या स्थितीत सापडला. संदीप गोविंद शिवगण (रा. धनजीनाका, रत्नागिरी) आकीब खालीद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी), तौसिफ आसिफ मिरजकर (रा. राहुल कॉलनी, गवळीवाडा) अशी या संशयितांची नावे असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 128/2023 एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम 8 (क), 22 (ब), व 29 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले की, आरोपीला 14 मे 2023 रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच गुह्याचे तपासकाम अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांवरून दिसत आहे. तौसिफकडे 8.17 ग्रॅम हेरॉईन आढळल्याचा आरोप असून तो विकीसाठी असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही, असे नेंदवत आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.