मासेमारी बंद; मासळीचे दर दामदुप्पट

रत्नागिरी:- समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तिनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशेवर तर पावसात मिळणारे काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यासारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोनी विकली जात आहे. मासे खवय्यांची पंचाईत झाली असून अनेकजणं चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट 280 ते 290 रुपयांवर पोचला आहे.

मोसमी पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोकण किनारपट्टीवर जुनच्या पहिल्या पंधरवड्यात कडकडीत उन पडलेले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला आहे. 1 जुनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाणे कमी असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्याप्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेकजणं सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात. रविवारी (ता. 18) गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेल पहायला मिळाले. मासे खरेदी करताना अनेकांच्या खिशाला चाट बसली. मोठा खेकडा 600 रुपयाला एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे 150 रुपये शेर होते. ते शंभर रुपयांनी विकले जातात. पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला 250 ते 300 रुपये अर्धा किलो दर आहे. किलोला 500 ते 600 रुपये आकारले जात आहेत. बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यासारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत. सध्या कोकणात आकाडीचा सण साजरा होत असल्यामुळे चिकन, मटणाला मोठी मागणी आहे. काहीजणं मासे आणून त्यावर इच्छा भागवून घेतात. पण माशांचे दर पाहून काहींचा कल चिकन खरेदीकडे आहे. तिथेही चिकनचे दर तिनशे रुपये किलो आहेत. त्यामुळे यंदा आकाडीवर महागाईचे सावट निर्माण झाले आहे.