…अन्यथा भारती शिपयार्डबाबत नकारात्मक निर्णय

‘योमन मरीन’चा स्थानिकांना इशारा; बळजबरीने उघडली सुरक्षा गेट

रत्नागिरी:- शहराजवळील मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड या दिवाळखोरीत निघालेला जहाजबांधणी प्रकल्पाची मालमत्ता योमन मरीन या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी एनसीएलटच्या मार्गदर्शक तत्वानुसार कायमस्वरूपी दगडी कंपाऊंड आणि गेट उभारले आहेत. परंतु काही ग्रामस्थांनी दमदाटी करून बळजबरीने ही गेट उघडण्यास भाग पाडले. त्यामुळे शांतता व सुरक्षितता प्रश्न निर्माण झाला आहे. हिच स्थिती यापुढेही कायम राहिल्यास प्रकल्प उभारणी कामासंदर्भात कंपनीला नकारात्मक निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देणारे पत्र कंपनीने सडामिऱ्या ग्रामपंचायतीलाला दिले आहे. कंपनी सुरू करण्यात काही अडचणी येत असल्याने दुसऱ्या टप्प्यातील कामगार भरती सध्या थांबविण्यात आल्याचे समजते.

मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. त्यानंतर येथे नव्या उद्योगाला चालना देण्यासाठी व त्या कंपनीचे पुनर्जीवन करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न सुरू ठेवले. त्यांच्या प्रयत्नांन यश आले असून भारती शिपयार्डच्या जागी आता ‘योमन मरीन या कंपनीचे कामकाज सुरू झाले आहे. कंपनीच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणानुसार प्रकल्प उभारणीची पूर्तता ग्रामपंचायतीबरोबर समन्वय साधून करण्याचा कंपनीचा मानस आहे. सौहार्दाच्या वातावरणातच प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. भारती डिफेन्स आणि इन्फ्रास्टक्टर लिमिटेड (पूर्वीची भारती शिपयार्ड लिमिटेड) ही दिवाळखोरीतील कंपनी, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या (एनसीएलट) आदेशानुसार ई-लिलाव पद्धतीने मिळवलेली आहे. योमन मरीन ही कंपनी संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या युद्धनौकांच्या बांधणीचे व दुरुस्तीचे कार्य करत आहे. हे काम देशाला राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करतात.

मिऱ्या येथे सुमारे ४० वर्षापासून भारती शिपयार्ड ही कंपनी जहाज बांधणी व दुरुस्ती या उद्योगासाठी कार्यरत होती. परंतु हळुहळु ही कंपनी आर्थिक डबघाईला आली आणि कालांतराने बंद पडली. या कंपनीवर तालुक्यातील सुमारे पंधराशे लोकांना रोजगार मिळाला होता. त्यामुळे अनेकांची कुटुंबे या कंपनीवर सुरू होती. परंतु कंपनी बंद पडल्यानंतर या भागाला आलेली सुबत्ता हळुहळु नाहीशी झाली.

टप्प्या-टप्प्याने सुरू होणार
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे कंपनी टप्प्या-टप्प्याने सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी मोजक्याच कर्मचाऱ्यावर सुरू आहे. परंतु कंपनीची मालमत्ता सुरक्षित राहावी यासाठी दगड कंपाऊंड आणि गेट उभारण्यात आले होते. ते काहींनी बळजबरीने उघडल्यामुळे कंपनीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्याबाबत कंपनीने स्थानिक ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. अशी बळजबरी राहिल्यास प्रकल्प उभारण्याबाबत विचार करावा लागेल, असा स्पष्ट इशारा कंपनीने दिला आहे.