संगमेश्वर कळंबुशीत पाणी योजनेचा वाद पेटला; दोघांवर हल्ला

संगमेश्वर:- तालुक्यातील कळंबुशी येथे जल जीवन पाणीपुरवठा आणि अलेटी नळपाणी योजनेच्या वादातून दोघांवर तलवार उगारून हातांनी मारहाण केली. याप्रकरणी आठ जणांविरोधात संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जून रोजी रात्री ११ वा. घडली आहे.

जयप्रकाश चव्हाण, हरेश चव्हाण, अनंत चव्हाण, अजिंक्य चव्हाण, रुपेश चव्हाण, आदित्य चव्हाण, आकाश चव्हाण सुमित चव्हाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी आणि संशयित आरोपी यांच्यात पाणी योजनेच्या कामकाजावरुन वादविवाद सुरु आहेत.

शुक्रवारी रात्री फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत कळंबुशी मधरा करंडा येथे गप्पा मारत असताना संशयितांनी तेथे दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर हातातील तलवार त्यांच्यावर उगारुन शिवीगाळ करत पाणी योजनेला विरोध केलात तर बघून घेऊ, अशी धमकी दिली. संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.