रत्नागिरी पोलीस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या; बदली ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश

रत्नागिरी:- जिल्हा पोलिस दलातील ६१ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले आहेत. बदली झालेल्या ६१ जणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांचा समावेश आहे. बदलीचे आदेश काढताना बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे असे आदेश देखील देण्यात आले आहेत.

शुक्रवारी जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीत जिल्हाअंतर्गत बदल्यांचा निर्णय घेण्यात आला. ६१ जणांच्या बदल्यांचे आदेश काढताना बदली झालेल्या अंमलदार यांनी त्यांच्याकडे असलेले गुन्हे आणि अर्ज प्रकरणे नेमणुकीच्या इतर पोलीस अंमलदार यांच्याकडे देऊन त्यांची नोंद ठेवून बदली झालेल्या अंमलदार यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिले आहेत. बदली झालेल्या अंमलदार यांना तत्काळ कार्यमुक्त न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

बदली झालेल्या ६१ जणांमध्ये संदेश सारंग यांची शहर पोलीस स्थानकातून पोलीस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. शरद भागवत यांची शहर वाहतूक शाखा येथून शहर पोलीस स्थानक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी निखार्गे यांची पोलीस मुख्यालय येथून रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक येथे नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाकर बोरकर यांची स्थानिक गुन्हे शाखेतून सुरक्षा शाखा, संजय कांबळे स्थानिक गुन्हे शाखेतून जिल्हा विशेष शाखा, राजेश सावंत यांची पोलीस मुख्यालय येथून रत्नागिरी ग्रामीण, प्रवीण बर्गे यांची शहर पोलीस स्थानक येथून राजापूर पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे.