नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा नदी पात्रात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- नदीवर आंघोळीला गेलेल्या कॉलेज तरुणाचा काजळी नदीच्या पात्रात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. संगमेश्वर तालुक्यातील तीवरे ढवळवाडीतील श्रेयस रवींद्र ढवळ (वय १७) हा काजळी नदीवर आंघोळीला गेला असता बुरंबी कोंडीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

श्रेयस हा उन्हाळी सुट्टी असल्याने गावी आला होता. श्रेयस रत्नागिरी मध्ये शिक्षण घेत होता, यंदा अकरावी परीक्षा पास होऊन तो बारावीला गेला होता. अत्यंत मनमिळाऊ व हुशार विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याला एक बहीण आहे. त्याच्या आकस्मित जाण्याने सर्वानाच धक्का बसला असून त्याच्या मृत्यूची खबर मिळताच साखरपा पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे.