जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दोन हजारांवर

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शाळांची सध्या शिक्षकांअभावी अवस्था बिकट बनली आहे. या वर्षी पुन्हा एकदा 725 शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर गेले आहेत. त्यात शिक्षक भरती न झाल्यामुळे जवळपास 2 हजार पदे रिक्त आहेत. हे रिक्त पदांचे ग्रहण लागलेले असतानाच शासनाने पुन्हा पुढील वर्षीसाठी आंतरजिल्हा बदलीने जाणार्या शिक्षकांची प्रक्रिया सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस स्मार्ट होत चालल्या आहेत. दर्जाही राज्यात नंबर वनचा ठरत आहे. अशा सर्व गोष्टी चांगल्या होत असतानाच सध्या मात्र रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. शिक्षक भरतीचा पत्ता नसताना यावर्षी पुन्हा 725 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास दोन हजार पदे रिक्त होणार आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या मागील वर्षातील आंतरजिल्हा बदल्यांमुळे 27 टक्के पदे रिक्त झाली असतानाच पुढील वर्षांसाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश नुकतेच शासनाकडून प्राप्त झाले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरतीचा पत्ता नसता नव्याने या आदेशामुळे प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या अडीच हजार शाळांमध्ये सुमारे सहा हजाराहून अधिक शिक्षक आहेत. त्यामधील 1100 पदे रिक्त होती. नुकत्याच झालेल्या आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेनंतर 725 शिक्षकांना परजिल्ह्यात कार्यमुक्त करण्यात आले होते. तसेच नवीन शैक्षणिक वर्षापर्यंत सेवानिवृत्त होणार्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा 2 हजाराच्या वर जाणार आहे. राज्यात शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल कामगिरी करणार्या रत्नागिरी जिल्ह्याला पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांअभावी पिछाडीवर जावे लागणार आहे. शिक्षक भरती नव्याने करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात येणार होते; परंतु अजुनही त्याची कार्यवाही झालेली नाही. प्रत्यक्ष भरती प्रक्रिया होईपर्यंत पुढील शैक्षणिक वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची वानवा असेल. नवीन शिक्षक मिळेपर्यंत आंतरजिल्हा बदल्या करु नका असे रत्नागिरीतून सांगितले जात होते.

प्रशासनाकडूनही वारंवार याबाबत पत्रही दिले गेले. परंतु बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त करा असे आदेश शासनाकडून आल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला कार्यवाही करावी लागली. शिक्षकांच्या रिक्त पदाचा खड्डा पडलेला असतानाच पुढील शैक्षणिक वर्षासाठी आंतरजिल्हा बदलीने जाणार्यांचे प्रस्ताव मागवा आणि त्याचा कार्यक्रम राबवा अशा सूचना नुकत्याचे प्राप्त झाल्या आहेत. ही प्रक्रिया जुनपासून सुरु होईल.
रत्नागिरी जिल्ह्यात परजिल्ह्यातील शिक्षकांचा अधिक भरणा आहे. त्यातील बरेचसे शिक्षक हे परजिल्ह्यात जाण्यास इच्छुक आहेत. नवीन भरती होण्यापूर्वी या प्रस्ताव सादर करणार्या शिक्षकांना कार्यमुक्त केले तर रत्नागिरीतील प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था होणार आहे.