हर घर जल, हागणदारीमुक्त गावांची घोषणा करण्याचे निर्देश

रत्नागिरी:- जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ज्या गावांमध्ये जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले ते गाव हर घर जल घोषित करावे तसेच हागणदारीमुक्त अधिक गावाच्या निकषांची पूर्तता करणार्‍या गावास हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याचे निर्देश शासनाने जिल्हा परिषदेला दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख आणि गटविकास अधिकारी (बीडीओ) यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. जागतिक जल दिनानिमित्त केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांना हर घर जल गाव व हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जलजीवन मिशनच्या निकषानुसार गावातील कार्यात्मक घरगुती नळजोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, मिशन या सार्वजनिक संस्थांना नळजोडणी पूर्ण केलेल्या व नळजोडणीद्वारे नियमित पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार्‍या गावांना हर घर जल म्हणून घोषित करण्यात येते.
तसेच हागणदारीमुक्त अधिक गाव अंतर्गत शौचालयांचा नियमित वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषांची पूर्तता केल्यास गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात येते. जलदिनाच्या अनुषंगाने निकष पूर्ण करत असलेल्या गावांना हर घर जल हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून गाव घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत ही नावे घोषित होणे अपेक्षित आहे.