राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई:- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे.

तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिक्षक आमदाराने नाकारली पेन्शन

विधान परिषदेतले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषद सभापतींना पत्र लिहून पेन्शन नाकारत असल्याचं म्हटलं आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नसल्याने आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या मोहीमेमध्ये सहभागी होत त्यांना पेन्शन घेण्यास नकार दिलेला आहे.

ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पेन्शन नाकारली आहे. शिक्षकांनी जुनी पेन्शन मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.