दोन वर्षात सखी सेंटरने फुलवले 375 पिडीत महिलांचे संसार

रत्नागिरी:- महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी व अत्याचारग्रस्त महिलांचे हिंसेपासून तात्काळ संरक्षण होण्यासाठी एकाच छताखाली मानसिक आधार व समुपदेशन, कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शनासाठी रत्नागिरीत सुरू असलेले ‘सखी’ सेंटर महिलांना आधार ठरलेय. गेल्या 2 वर्षात आतापर्यंत एकूण 375 पिडीत महिलांना लाभ देताना अगदी अटीतटीला गेलेल्या प्रकरणात ‘सखी’ने त्या दाम्पत्यांचे संसार पुन्हा फुलवले. आतापर्यंत 139 महिलांनी निवार्‍यासाठी धाव घेतली, समुपदेशनासाठी 189, पोलिस सहायतेसाठी 117 व कायदे विषयक सहाय्य 109 तर वैद्यकीय मदत लाभलेल्या 116 महिलांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

रत्नागिरीमध्ये 15 फेब्रुवारी 2021 रोजी सखी सेंटरचे औपचारिक उद्घाटन होवून प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात झाली. योजना ही जिल्हा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत असून संचलित म्हणून भाकर सेवा संस्था आहे. याचे काम व्यवस्थापन समिती पाहते व त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व सचिव हे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आहेत. रत्नागिरीतील पिडीत महिलांना आधार देण्यासाठी व तात्काळ मदत होण्यासाठी 14 लोकांचा कर्मचारी वर्ग 24 तास कार्यरत आहेत. त्यामध्ये 1 केंद्रप्रशासक, 2 केस वर्कर, 1 समुपदेशक, 1 पॅरालिगल ऑफिसर, 1 पोलिस सुलभता अधिकारी, 2 पॅरामेडिकल ऑफिसर, 1 आयटी स्टाफ, 4 सुरक्षा रक्षक व 1 बहुद्देशीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली.

सखी सेंटर व तेथील कर्मचारी नेहमीच महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. अत्याचारग्रस्त महिलांचे हिंसेपासून तात्काळ संरक्षण होण्यासाठी त्यांना एकाच छताखाली मानसिक आधार व समुपदेशन, कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन, तात्काळ वैद्यकीय सेवा, पोलीस सेवा तसेच पिडीत महिलेस गरज भासल्यास 5 दिवस निवाऱयाची सोय इत्यादी सेवा आवश्यकतेनुसार मोफत पुरविल्या जातात. तसेच पिडीतेसोबत सर्व वयोगटातील मुली व 6 वर्षापर्यंतचा मुलगा सेंटर मध्ये राहू शकतो. सर्व सेवा व सुविधा ह्या मोफत व 24 तास पुरविल्या जातात.

सखी सेंटर येथे कोणत्याही वयोगटातील महिला, 18 वर्षाखालील बालिका तसेच बलात्कार पिडीत, लैगिक शोषण झालेली, हुंडा बळी, शारीरिक व मानसिक छळ झालेली, कामाचा ठिकाणी होणारा लैंगिक छळ, तसेच बालिका संरक्षण व मदत घेण्यासाठी सेंटर मधे येवू शकतात. 18 वर्षा खालील बालिकांच्या बाबतीत वन स्टॉप सेंटर हे बालन्याय अधिनियम कायदा 2015 व लैंगिक गुह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अंतर्गत कार्यरत सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवते.

रत्नागिरी मधे सखी वन स्टॉप सेंटर सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 375 पिडीत महिलांनी सेवेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी काही प्रकरणे ही अगदी अटीतटीला गेली असताना ते उभयता सखी सेंटरमध्ये आल्यानंतर त्यांच्यातील गैरसमज दूर होवून ते सद्यस्थितीत सुखाने नांदत आहेत. तसेच सखी सेंटर मधे आतापर्यंत 139 केसेस निवार्‍यासाठी दाखल झाल्या असून त्यांनी येथे माहेरपण अनुभवल्या जाताना सांगितले. तसेच समुपदेशनासाठी 189 केसेस, पोलिस सहायतेसाठी 117 व कायदे विषयक सहाय्य 109 केसेस आहेत. तर वैद्यकीय मदत लाभलेल्या 116 केसेस आहेत. ज्या केसेसची मानसिक स्थिती चांगली नव्हती अशा महिलांना त्यांची सुश्रुषा करून जिल्हा मनोरुग्णालय येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. काही महिलांना त्यांच्या घरचांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. तसेच काही महिलांना प्रतिभा महिलाश्रम व आजी आजोबांचा गाव (वृद्धाश्रम) येथे पुढील निवासासाठी नेवून सोडण्यात आले.

अजूनही संपूर्ण जिल्हयातील महिलांना सखी विषयी माहिती नाही. तरी ज्या महिलांना मदतीची गरज असेल त्यांनी पत्ता : सखी वन स्टॉप सेंटर रत्नागिरी, शासकीय अध्यापक महाविद्यालय आवार, आयडीयल शाळेसमोर, बोर्डिंग रोड, रत्नागिरी. संपर्क क्रमांक : 87938 87559, 99703 81195 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

‘सखी’ची उल्लेखनीय कामगिरीः सखी सेंटर या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आतापर्यंत रत्नागिरी जिह्यात 150 हून अधिक जनजागृती कार्यक्रम घेतले. शाळा, महाविद्यालये, झोपडपट्टी, ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, आरोग्य केंद्रे, बाजारपेठा, महिला बचत गट, अशा ठिकाणी जावून सखी विषयी माहिती देत केली जनजागृती. पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती पदयात्रा काढण्यात आली व वृक्षलागवड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता करण्यात आली. 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील 75 ठिकाणी सखीची माहिती पत्रके वाटून जनजागृती केली. आकाशवाणी केंद्र रत्नागिरी येथे सखी विषयी माहिती देण्यासाठी सखी सेंटरच्या केंद्रप्रशासक यांची मुलाखत घेण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय पोस्टर मेकिंग स्पर्धेत रत्नागिरी सखीला देशपातळीवर द्वितीय क्रमांक मिळाला.