जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द: पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा या दृष्टीकोणातून शासन कटीबध्द आहे अशा ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळयात दिली.

 येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअमवर मुख्य शासकीय सोहळा झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांची प्रमुख उपस्थिती होती.

  या दिनानिमित्त पालकमंत्री या नात्याने शुभेच्छा देताना मला विशेष आनंद आहे असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले. राज्यात रत्नागिरी वासीयांइतका उत्साही प्रतिसाद कुठेच नसेल असे सांगून सोहळयात आलेल्या नागरिकांचे अभिनंदन करीत आभार आपल्या भाषणात मांनले. भटक्या जाती व जमाती समितीचे माजी अध्यक्ष भिकुजी उर्फ दादा इदाते यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित केला आहे. ही सर्व जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे असे सांगून त्यांनी दादा इदाते यांचे अभिनंदन केले. या दिमाखदार सोहळयात पोलिस दलांसह, होमगार्ड, एन.सी.सी., ग्रीन आर्मी आणि कोकणी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पथकांसह चित्ररथ यांचे संचलन यावेळी झाले. पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल यावेळी मंत्री महोदयांच्या भिकुजी इदाते यांचा सत्कार आंरभी करण्यात आला. त्यानंतर विविध गुणवंताचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.