सकल जैन बांधवांकडून रत्नागिरीत मूकमोर्चा; समाजाकडून दुकाने दुपारपर्यंत बंद 

रत्नागिरी:- पालिताणा (सौराष्ट्र, गुजरात) येथे प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या पादुकांची समाजकंटकांनी केलेल्या विटंबनेविरोधात रत्नागिरीतील सकल जैन समाजाने मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. तसेच जैन समाजाची सर्व दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. या कालावधीत सर्व जैन बांधवांनी काळ्या फिती लावून मोर्चेकऱ्यांनी निषेध केला. मूक मोर्चा नंतर जैन बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. 

श्री जैन श्वेतांबरमूर्तीपूजक संघ, श्री वर्धमान स्थानकवासी संघ आणि श्री दिगंबर जैन मंडळातर्फे मोर्चा काढला. यामध्ये साडेतीनशेहून अधिक बंधू-भगिनी सहभागी झाले. जैन मंदिर, राम आळी, गोखले नाका, मारुती आळी, एसटी स्टॅंड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चामध्ये निषेधाचे फलक दाखवण्यात आले तसेच हाताला काळ्या फिती लावल्या होत्या. शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे निवेदन सादर केले.

झारखंड येथे जैन समाजाच्या सम्मेद शिखर तीर्थ कल्याणभूमी या धर्मस्थळाचे पर्यटनस्थळात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाविरोधातही निषेध नोंदवण्यात आला. याबाबत राज्य सरकारने पुढील महिन्यात जैन समाजाला बाजू मांडण्याची संधी दिली असून हे पर्यटनस्थळ होणार नाही, असा दावा सकल जैन समाजाने मूक मोर्चा नंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला.

मोर्चानंतर जैन भवन येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला भरत जैन, महेंद्र गुंदेचा व अजित शिराळकर या प्रमुखांसह दिलीप संघवी, मनिष जैन, अरविंद जैन, अशोक मणियार, मुकेश गुंदेचा, नीलेश शाह, भैरू ओसवाल, सूर्यकांत कटारिया, रिंकेश जैन, जयंतीलाल ओसवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पालिताणा येथे जैन समाजाचा शत्रुंजय पर्वत आहे. येथे जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येन येतात. परंतु समाजकंटकांनी हा पर्वत अवैधपणे ताब्यात घेतला जात असून भाविक, साधूंना त्रास दिला जात आहे. तसेच गुरु मंदिरातील पादुकांची नासधूस करण्यात आली असून सीसीटीव्हीमध्ये हे रेकॉर्ड झाले आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

झारखंडमधील सम्मेद शिखर तीर्थ येथे २० तीर्थंकरांची कल्याणभूमी आहे. या ठिकाणी झारखंड राज्य सरकारने पर्यटनस्थळ विकसित करण्याची घोषणा केली आहे. याला भारतातील जैन समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यासंदर्भात पुढील महिन्यात जैन समाजाला आपली बाजू मांडण्याकरिता बोलावण्यात आले आहे. त्यामुळे हे धर्मस्थळच राहिल, पर्यटनस्थळ होणार नाही, असा विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.