कोरे मार्गावरील मत्स्यगंधा, मंगळूरु एक्स्प्रेसमध्ये आता रात्रगस्त

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांमध्ये वांरवार चोर्‍या होत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बदलाकडून मत्स्यगंधा, मंगळूरु एक्स्पे्रसमध्ये रात्रीची गस्त सुरु केली आहे. प्रवाशांबरोबर संवाद साधत जनजागृती करतानाच संशियतांवर रेल्वे सुरक्षा बदलाची करडी नजर राहणार आहे. यामुळे चोर्‍यांना आळा बसणार असून प्रवासीही सतर्क होणार आहेत.

मुंबईसह अन्य जिल्ह्यातून कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही गाड्यांमध्ये पंधरा दिवसातून अज्ञात चोरट्याकडून एखादा प्रकार घडल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करतात. चार्जिगला लावलेला मोबाईल चोरुन नेणे, पॉकिट लांबवणे, दागिन्यांची पर्स चोरणे यासारखे प्रकार घडत आहेत. प्रवाशांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. प्रवाशांमधील भिती दूर करण्यासाठी यापुर्वी प्रत्येक स्थानकावर स्थानिक पोलिसांचाही फौजफाटा ठेवला जातो. मत्स्यगंधा, मंगळूर एक्स्प्रेस सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या मोजक्याच स्थानकांवर थांबतात. याचाच फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. स्थानक येण्यापुर्वी प्रवाशांची बॅग लांबवून चोरटा पळून जातो. हा प्रकार लक्षात येईपर्यंत उशिर होतो आणि चोरट्याला पकडण्यात अडथळे येतात. गेल्या महिन्याभरात सुमारे चार प्रकार घडल्याचे पुढे आले आहे. काही दिवसांपुर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने एका अट्टल चोरट्याला प्रवासामध्येच पकडले होते. चोर्‍यांचे प्रकार रात्रीच्या सुमारास घडत असल्याने रेल्वे सुरक्षा बलही सतर्क झाला आहे. प्रत्येक स्थानकावर पोलिसांच्या मदतीने बंदोबस्त ठेवला जात आहे. तसेच सणासुदीवेळी गर्दीप्रसंगी दिवस-रात्र गस्त घातली जाते. त्याप्रमाणे रेल्वे सुरक्षा बदलाकडून रात्रीची गस्त सुरु करण्यात आली आहे. मत्स्यगंधा, मंगळुर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बदलाचे कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्यांच्यामार्फत प्रवाशांशी संवाद साधून चोरट्यांपासून सतर्क रहा असे आवाहन केले जाते. याद्वारे प्रवाशांमध्ये जनजागृतीही केली जात आहे.