कमी पटसंख्येची कोणतीच शाळा बंद करू नये

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात गाव विकास समितीचे धरणे आंदोलन

रत्नागिरी:-शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे ग्रामीण भागात एक जरी विद्यार्थी शाळेत शिकत असेल तरी ती शाळा बंद करू नये अशी मागणी गाव विकास समितीच्या वतीने संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय येथील धरणे आंदोलन दरम्यान केली.

20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात होऊ नये अशी मागणी करत गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या संघटनेने संघटन प्रमुख सुहास खंडागळे, सरचिटणीस डॉ.मंगेश कांगणे,जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केले.

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुर्गम भागात शाळा आहेत.यातील अनेक शाळांचा पट हा 0 ते 20 च्या मध्ये आहे.कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यास येथील दुर्गम भागातील अनेक शाळा बंद होतील आणि गाव खेड्यातील ,दुर्गम भागातील सामान्य विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल असे गाव विकास समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आंदोलना दरम्यान दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कमी पटसंख्या असली तरी दुर्गम भागातील शाळा बंद होऊ नयेत अशी आमची भूमिका असून हीच भूमिका येथील विद्यार्थी व पालक वर्गाची आहे असे गाव विकास समितीने म्हटले आहे.

शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याने आणि विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अशा प्रकारचे निर्णय शासनाने घेऊ नयेत अशी मागणी गाव विकास समितीने केली आहे.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी,रत्नागिरी जिल्हा संघटक मनोज घुग,तालुका संघटक सुकांत पाडाळकर,संगमेश्वर तालुका संघटक प्रशांत घुग, ग्रामीण विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष दैवत पवार,सदस्य नितीन गोताड,महेंद्र घुग,शुभम गोरुले इत्यादी उपस्थित होते.