जयगड रिंगी फाटा येथे साखरेने भरलेल्या ट्रकला अपघात

रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा जयगड मार्गावर साखरेची गोणी घेऊन जाणाऱ्या ट्रकला शनिवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाने गाडीतून उडी मारल्याने सुदैवाने बचावला.

सविस्तर वृत्त असे की, शनिवारी सायंकाळच्या सुमारास जयगडहून रत्नागिरीच्या दिशेने साखरेची गोणी भरुन ट्रक निघाला होता. रात्री ८ वा. च्या सुमारास हा ट्रक रिंगी फाटा येथे आला असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला. ट्रक कलंडतोय असे लक्षात येताच चालकाने गाडीतून उडी मारली. यामुळे तो बचावला. साखरेची गोणी भरलेला ट्रक कलंडल्याचे कळताच सकाळी या ठिकाणी गर्दी झाली होती. ट्रक चालक मात्र त्याच ठिकाणी होता. आज रविवार १६ ऑक्टोबर रोजी दुपारी या ट्रकमधील गोणी दुसऱ्या ट्रक मध्ये भरण्याचे काम सुरु होते. अद्याप पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आलेली नाही.