रत्नागिरी:- भगवती किल्ला येथील २०० फुट दरीमध्ये मृतदेह सापडलेल्या तन्वी घाणेकर मृत्यू प्रकरणी पोलिस निष्कर्षापर्यंत आले आहेत. मृताची ओळख पटल्याने डीएनए चाचणी करण्याची गरज नाही. मात्र कॉल रेकॉर्ड तपासल्याने काहीअंशी चित्र स्पष्ट झाले आहे. संशय़ित आता पोलिसांच्या टप्प्यात असून लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.
तन्वी रितेश घाणेकर (वय ३३, रा. खालचा फगरवठार) असे मृतावस्थेत सापडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. त्या बेपत्ता झाल्याची तक्रार पती रितेश घाणेकर यांनी दिल्यानंतर तपासाला गती मिळाली. तन्वही २९ सप्टेंबरला सायंकाळी सव्वा सता वाजण्याच्या सुमारास मी बाजारात जावून येते, उशिर झाला तर जेवण करून घ्या, असे मुलगी आनंदी हिला सांगून दुचाकी (एमएच-०८-एक्स-७११६) घेऊन बाजारात गेल्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत त्या घरी न आल्याने पती रितेश यांनी ३० सप्टेंबरला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कालपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. तन्वी घाणेकर यांची दुचाकी भगवती किल्ल्यानजीक दोन दिवसांपूर्वी आढळून आली. त्यानंतर शहर पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम आती घेतली. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
त्यानंतर कपल पॉईंट, येथे दुर्गंधी येऊ लागल्याने सुमारे २०० फूट खोल दरीमध्ये जाऊन शोध घेतला. तेव्हा एका महिलेचा मृतदेह त्यांना आढळून आला. किनाऱ्या खाली उतरून पायवाटेने घटनास्थळी पोहचले. मृतदेह प्लास्टिक बॅगेत भरून स्ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आला. तो विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. ही नेमकी आत्महत्या आहे, की घातपात याबाबत पोलिस तपास सुरू आहे. आत्महत्या असेल तर त्याच्यामागे एवढे गंभीर कारण काय, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांना घटनास्थळी मंगळसुत्र, पैंजन आणि गाडीची चावी सापडली आहे. यावरून तिची ओळख पटली आणि नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मात्र ही आत्महत्या आहे, की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. त्याअनुषंगाने पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडुन काही माहिती मिळाली आहे. त्यानंतर तन्वीचा मोबाईल शोधण्याचे काम सुरू आहे. परंतु अजून ते मिळालेला नाही. तरी तिच्या मोबाईल नंबरचे सहा महिन्यांचे कॉल डिटेल्स पोलिसांनी घेतले आहेत. यामध्ये महत्त्वाची माहिती पुढे आली असून संशय़ित आता पोलिसांच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे हे मृत्यू प्रकरण लवकरच उघड होण्याची शक्यता आहे.