जिल्ह्यातील १५ ट्रॅव्हल्सवर आरटीओ कारवाई

नाशिक दुर्घटनेनंतर सतर्क ; ५४ बसची तपासणी

रत्नागिरी:- नाशिकमध्ये अपघातानंतर बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १२ प्रवाशांचा होरपळुन मृत्यू झाला. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यात खासगी ट्रॅव्हल्स विरुद्ध  जोरदार तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील ५४ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी आपत्काली दरवाजा नसणाऱ्या आणि अग्निशमन यंत्रणा नसल्या 15 बसेसवर कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक येथे अपघातानंतर बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर उपप्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेऊन भविष्यात अशा दुर्घटना घडु नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार आरटीओ कार्यालयाने जिल्ह्यात खासगी बसची जोरदार तपासणी मोहीम राबवली. यामध्ये तपासणीत बसचा परवाना आहे की नाही, विशेष परवाना काढला आहे का?, योग्यता प्रमाणपत्र आहे का?, कर भरला आहे का?, बसमध्ये आपत्तकालीन दरवाज्याची व्यवस्था आहे का, बसच्या आतील भागात काही बदल केले आहेत का?, बसमधून माल वाहतूक सुरू आहे का?, अग्निशमन यंत्रणा आहे का? याची तपासणी करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरीने जिल्ह्यातील ५४ खासगी बसची तपासणी केली. त्यामध्ये १५ ट्रॅव्हल्स दोषी आढळल्या. पाच बसकडे विशेष परवाना नव्हता. दोन बसकडे योग्यता प्रमाणपत्र नव्हते, दोन बसनी कर भरला नव्हता. १० बसमध्ये आपत्तकालीन दरवाजा नसल्याचे निदर्शनास आले. तीन बस मध्ये अग्निशमन यंत्रणा नव्हती. या 15 बसमालकांकडून दंड वसूल करण्यात येणार असून ही कारवाई पुढे सुरूच राहाणार आहे.