जाकादेवी खालगाव येथील 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जाकादेवी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील एका 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सायली शशिकांत कांबळे (20, मूळ गाव- खानू ता.रत्नागिरी) असे या तरुणीचे नाव आहे. तिने जाकादेवी येथील आपल्या घरातील सिलिंग फँनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन काल शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.

सायली शशिकांत कांबळे हिची एम.बी.बी.एस. करण्याची इच्छा होती. मुलीच्या इच्छेनुसार तिच्या आई वडिलांनी परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी जायला शुक्रवारी मुंबईत जाऊन विजाही काढला होता. मुंबईतून ती वडिलांसोबत शनिवारी सकाळी जाकादेवीत आली. घरातील नेहमीप्रमाणे तिने कामेही केली.

आई व वडील घरी असताना आपल्या बेडरूममध्ये जावून तिने शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याचे दृष्टीस आले. या घटनेचा आई वडिलांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला. सायली बालपणापासून हुशार होती. मेडिकल क्षेत्राची तिला आवड होती. सायली हिने नेमकी आत्महत्या का केली? याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्वाती राठोड, नम्रता राणे, उदय वाजे अधिक तपास करत आहेत.