मिऱ्या बंधारा रखडला, ठेकेदाराला १८ लाखाचा दंड

रत्नागिरी:- मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराला पत्तन विभागाने चांगलाच दणका दिला आहे. मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्याचे वर्षभरात अपेक्षित काम न झाल्याने १८ लाख ८० हजाराचा दंड करण्यात आला आहे. नुकताच हा प्रस्ताव पत्तन विभागाच्या मुख्य कार्यालयाने मंजूर केल्याचे पत्तन विभागे सांगितले. वेळेत आणि दर्जेदार काम व्हावे, यासाठी पत्तन विभाग या कामावर लक्ष ठेऊन आहे.

मिऱ्या गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे साडेतीन किमीच्या पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मिऱ्यावासीयांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे. मात्र १० महिन्यांचा कालावधी कालावधीच्या अनुषंगाने अपेक्षित काम संबंधित ठेकेदाराने केलेले नाही. बंधाऱ्याचा अजून एकही दगड लावला गेला नाही. रत्नागिरीचे पत्तन अभियंत्यांनी याबद्दल संबंधित ठेकेदारावर १८ लाख ८० हजार रूपयांचा दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव किनारा अभियंत्यांकडे २९ जून २०२१ ला पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारावर १८ लाख ८० हजाराची दंडात्मक कारवाईचा करण्यात आल्याची माहिती पत्तन विभागाने दिली.

पंधरामाड, मिऱ्या, भाटीमिऱ्या, आलाव भागाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा बंधारा बांधण्यात येणार आहे. समुद्राचा प्रवाह बदलल्याने या भागा मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची धुप झाली आहे. समुद्र ग्रामस्थांच्या सात-बारा उतारावर आला आहे. पावसाळ्यात या भागाला समुद्राचे पाणी घरात शिरण्याची भिती असते. ग्रामस्थांच्या  सुरक्षेच्यादृष्टीने या बंधाऱ्याचे काम वेळेत होणे अपेक्षित आहे. परंतु ठेकेदाराकडुन विलंब होताना दिसत आहे. कारवाईमुळे या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.