जिल्ह्यातील विकासकामे राज्यासाठी मार्गदर्शक ठरावी: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत, तथापि जिल्ह्यात होणारी विकासकामे संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरावी या पद्धतीने पुढील काळात आपण काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

गांधी जयंती निमित्ताने आयोजित स्वच्छता अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र, नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छतेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या आरंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्वच्छता अभियान कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री सामंत म्हणाले, रत्नागिरी जिल्हा पर्यटनदृष्ट्या प्रगत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते. स्वच्छतेचे हे अभियान मोहिमे पुरते न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छता ठेवून या कामात आपण सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती आदी कामांमध्ये स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र या संस्थेचे काम उल्लेखनीय असे आहे. ही संस्था अनेक वर्षांपासून शासनासोबत काम करत आहे. या स्वरूपाचे काम आगामी काळात होईल. तसेच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह म्हणालेत्र परिसर स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून याबाबतीत बाळ सत्यदारी महाराज वसंत संस्थेने केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.