मांजर आडवे येऊन झालेल्या अपघातात महिला ठार

रत्नागिरी:- मुलाच्या शाळेतून घरी घेऊन जात असताना दाम्पत्याच्या दुचाकीसमोर मांजर आडवे येऊन झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४ वा.च्या सुमारास खेडशी आकाशवाणी केंद्राच्या मागील बाजूस घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश सावंत व अनामिका सावंत हे दोघे पती-पत्नी हे आपल्या मुलाच्या शाळेतील मिटिंग आटपून घरी जायला निघाले होते. सायंकाळी ४ वा.च्या सुमारास ते दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीसमोर अचानक मांजर आडवे आले आणि दुचाकीला अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या अनामिका सावंत या दुचाकीवरून फेकल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या कानातून रक्त वाहू लागले.

हा अपघात पाहताच अपघातस्थळी असणार्‍या ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली आणि एका रिक्षेतून त्यांना कारवांचीवाडी येथील खासगी रुग्णालयात नेले. मात तेथील डॉक्टरांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात घेऊन जा, असा सल्ला दिल्याने अनामिका यांना घेऊन ते जिल्हा रुग्णालयात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.