शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी नगरोत्थान योजनेतून 100 कोटी मंजूर 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी राज्य नगरोत्थान समितीने 100 कोटी रूपये मंजूर केले आहेत. काँक्रीटच्या रस्त्यावर देखभाल दुरूस्तीसाठी किमान 30 वर्षे तरी काहीच खर्च करावा लागत नाही. ना. सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे अवघ्या काही दिवसांत 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. 

रत्नागिरी शहरात सुमारे 110 कि.मी.चे सर्व रस्ते असून, 80 फुटी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सर्वच वाहनांची वाहतूक असते. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळेही चांगले रस्ते खराब होतात. अवजड वाहनांचीसुद्धा याच मुख्य रस्त्यावर रेलचेल असते. त्यात उतारांचे रस्ते असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात. दरवर्षी हे खड्डे बुजवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेला लाखो रूपये खर्च करावे लागतात.

शहरातील हा मुख्य रस्ता सर्वांच्याच नजरेत येत असल्याने त्यावर खड्डे पडले की ओरड सुरू होते. त्यामुळे रस्ता काँक्रीटचा झाल्यानंतर ही ओरड संपुष्टात येणार आहे. पर्यायाने रस्ता झाल्यानंतर त्यावेळच्या सत्ताधार्‍यांच्या विरोधातील नेत्यांना खराब रस्त्यांचा मुद्दा सोडून द्यावा लागणार आहे. राज्य नगरोत्थान समितीने मंजूर केलेल्या 100 कोटी रूपयांतून किमान 9 ते 10 कि.मी.चा रस्ता काँक्रीटचा होणार आहे. तब्बल 30 वर्षे अशा रस्त्यांच्या दुरूस्तीला कोणताच खर्च करावा लागणार नसल्याने रनपचे दरवर्षीचे खड्डे भरण्यासाठी खर्च होणारे लाखो रूपये वाचणार आहेत.(रत्नागिरी एक्सप्रेस न्युज)