टर्मिनल, ट्रॅकसाठी जागा नसल्याने विमानतळाला विलंब

केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्र्यांचे उत्तर; अधिवेशनात खासदार राऊतांचा प्रश्न

रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळ जेथे आहे तेथील पुनर्विकास होणे गरजेचे आहे. विमानतळाचा स्तर उंचावणे आवश्यक आहे. तसेच त्यासाठी अत्यावश्यक सिव्हिल टर्मिनल भवन, समांतर टॅक्सी ट्रॅक, नेव्हिगेशन सेंटर या सेवांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री डॉ. विजयकुमार सिंह यांनी खासदार विनायक राऊत यांनी अधिवेशनात विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तर दिले आहे.

देशाच्या सर्वोच्च सभागृहात खासदार सातत्याने रत्नागिरी विमानतळाचा विषय मांडत आहेत. चिपी विमानतळ पूर्ण होण्यामागेही राऊत यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात व दिल्लीतही बंडखोरीचे सत्तानाट्य घडत असतानाही अधिवेशनात लिखित स्वरूपात प्रश्न विचारून आपली उपस्थिती दर्शवली आहे. नागरी विमान राज्यमंत्री डॉ. विजयकुमार सिंह (सेवानिवृत्त) यांना लिखित स्वरूपात रत्नागिरी विमानतळ नागरी यात्रा सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो सुरू करण्यास विलंब का, कोणत्या गोष्टींमुळे विलंब होतोय, याची सविस्तर माहिती द्यावी. तसेच हा विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यास सरकारने कोणती पावले उचलली आहेत, या लेखी प्रश्नांचा खुलासा मागितला.
नागरी विमान राज्यमंत्री डॉ. सिंह यांनी यावर उत्तर देताना म्हणाले, रत्नागिरी विमानतळ हा भारतीय तटरक्षक दलाच्या अधीन आहे. उडाण योजनेमध्ये (RCS) या विमानतळांचा समावेश केला आहे. तेथील पुनर्विकास होणे गरजेचे आहे. तसेच अशा विमानतळांचा स्तर उंचावणे आवश्यक असून त्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणजेच सिव्हिल टर्मिनल भवन, समांतर टॅक्सी ट्रॅक, नेव्हिगेशन सेंटर यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले आहे.