उधाणाचा मिऱ्या बंधाऱ्याला फटका; समुद्राचे पाणी मानवी वस्तीत 

रत्नागिरी:- जिल्ह्यासह कोकणात पावसाचा जोर असोरला असला तरी समुद्राला उधान आल्याने उंच लाटा किनार्‍यावर धडकत आहे. लाटाचा  तडाखा बसून मिर्‍या बंधारा पुन्हा ढासळू लागला आहे. जाकिमिर्‍या नजिकच्या उपळेकर बाग परिसरातील बंधारा पुन्हा वाहून गेला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा समुद्राच्या लाटांचे पाणी थेट मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसांनी अमावस्येपुर्वी येणार्‍या उधाणामुळे किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण होवू शकतो अशी भिती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जाकिमिर्‍या-भाटिमिर्‍या किनार्‍यावर बंधारा उभारण्यासाठी तब्बल १६९ कोटी रु.च्या कामाचे भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात जून्या पद्धतीनेच किनार्‍यावर दगड टाकण्याचे काम सुरु असल्याने या पावसाळयात मिर्‍यावसियांचा धोका कायम आहे.

कोकणातील चारही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल असला  तरी दि.१९ जुलैपर्यंत मुसळधार पावसासह समुद्राला उधान येण्याचा इशारा देण्यात आला आहे. उधानाच्या वेळी समुद्राचा लाटा मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर आदळतात. यावेळी लाटा किनार्‍यावर आदळून पुन्हा समुद्रात जाताना किनार्‍यावरील बंधार्‍याचे दगड आपल्यासोबत घेवून जातात. त्यामुळे किनार्‍यावरील  बंधार्‍याला अनेक ठिकाणी भगदाड पडते. सध्या जाकिमिर्‍या नजिकच्या उपळेकर बाग येथील बंधारा वाहून जाऊ लागला आहे. लाटांचा वेग वाढल्यास येत्या दोन-चार दिवसात बंधार्‍याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.

पंधरामाड-जाकिमिर्‍या-भाटिमिर्‍या संरक्षक बंधार्‍यासाठी सुमारे १६९ कोटी रु. मंजूर करण्यात आले आहे. तत्कालीन सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या हस्ते बंधार्याचे भूमिपूजन करण्यात आले होते.मात्र त्यानंतर पंधरामाडच्या  बाजून टेट्रापॉईट तयार करुन टाकण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र प्रत्यक्षात बंधार्‍याच्या कामाला सुुरुवात झालेली नाही. तर किनार्‍यावर इतर ठिकाणी पुर्वी प्रमाणे काळे दगड टाकण्याचे काम पावसापुर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र जून महिन्यात उपळेकर बाग येथे टाकलेले दगड दोन दिवसात समुद्राला आलेल्या उधानामुळे वाहून गेले आहे. त्यामुळे बंधाऱ्याला भगदार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असून सध्याच्या बंधार्‍यावरुन पाणी मानवी वस्तीत येत आहे. शनिवारी  पाऊस नसतानाही किनार्‍यावर उंच लाटा उसळत होत्या. त्यामुळे किनारी भागातील नागरिक भयभीत झाले आहे. गेले अनेक वर्ष मिर्‍यावासिय संरक्षक बंधार्‍यासाठी प्रयत्न करत होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिर्यावासियांना दिलेल्या आश्वासनानंतर प्रत्यक्षात बंधार्‍याला निधी उपलब्ध झाला.मात्र पावसाळा सुरु झाला तरी बंधार्‍याच्या मुख्य कामाला सुरुवात न झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.