आंबा घाटात दरीत कोसळता- कोसळता बचावला टेम्पो ट्रॅव्हलर; थोडक्यात वाचले १७ प्रवाशांचे प्राण

साखरपा:- रत्नागिरी- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील गायमुख जवळच्या एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने कर्जत वरून कोल्हापूर गणपतीपुळे मार्गावर प्रवास करणारी टेम्पो ट्रॅव्हल खोल दरीत जाता जाता बचावला. टेम्पो ट्रॅव्हलमध्ये 17 प्रवासी प्रवास करत होते. 

घाटात दाट धुके असल्याने हा अपघात घडला असण्याची शक्यता आहे. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती असे प्रवाशांच्या चेहऱ्यावरून वाटत होते. सुदैवाने हे प्रवासी सुमारे ५०० फूट खोल दरीत जाण्यापासून बचावले.संरक्षण कठडा असल्याने ही गाडी बचावली.

घटनेची  माहिती मिळताच साखरपा दुरक्षेत्रचे कर्मचारी वैभव कांबळे, अर्पिता दुधाने, प्रशांत नागवेकर, वैभव नटे आदी घटनास्थळी पोहोचले. तसेच जेसीबी चालक अशोक जाधव, सामजिक कार्यकर्ते पप्या दुधाने घटनास्थळी पोहचले. यांनी धोकादायक स्थितीत असलेली गाडी बाहेर काढून प्रवाशांचा जीव वाचवला व सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.