गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या

परिवहनमंत्री अनिल परब; पहिल्या टप्प्यात १३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध

रत्नागिरी:- कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २ हजार ५०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब  यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात १ हजार ३०० बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २५ जून २०२२ पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे. तर ५ जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही परिवहनमंत्री ॲड. परब यांनी केले.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील. ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला निघतील. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईल ॲपद्वारे, खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे, असेही परिवहन मंत्री.ॲड.परब यांनी सांगितले.