चक्रीवादळ, अतिवृष्टीत भूमिगत वीज वाहिनी प्रकल्पामुळे सुरळीत, दर्जेदार वीज मिळेल: ऊर्जामंत्री 

रत्नागिरी:-:चक्रीवादळे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती प्रसंगी भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठा मिळण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प -2 अंतर्गत रत्नागिरी शहरामध्ये 11 के.व्ही. कर्ला उच्चदाब उपरी विद्युत वाहिनी मार्गाचे भूमिगत विद्युत वाहिनीत रूपांतरण कामाच्या ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे, ऊर्जामंत्री यांचे खासगी सचिव सिद्धार्थ खरात, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, मुख्य अभियंता (कोपर) विजय भटकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, मुख्याधिकारी तुषार बाबर, अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, समुद्र किनारपट्टीच्या भागात खार्‍या हवामानामुळे वीज वाहिन्या गंजतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे अशा घटना घडतात. वीज ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होतो. आता या भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे या भागातील महावितरणचेही नुकसान टळेल व वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा मिळण्यास मदत होईल. या प्रकल्पाचे काम गतीने करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे.

तौक्ते व निसर्ग चक्रीवादळाच्या प्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे या भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. अति विशिष्ट कार्यामुळे रत्नागिरीत लोकार्पण सोहळयासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी राऊत यांनी गतवर्षीच्या आपत्तीप्रसंगी महावितरणच्या अधिकारी- कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले.