आलावा शेट्येवाडीजवळ सुरक्षेच्या कामाला आरंभ

नाराजीची दखल; दगड टाकून बंधारा बांधण्याचे काम

रत्नागिरी:- मिर्‍या येथील आलावा शेट्येवाडीजवळील बंधार्‍याचे काम करण्यापेक्षा किनार्‍यावरील ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. याची गंभीर दखल घेऊन पतन विभागाकडून तत्काळ कामाला आरंभ केला आहे. याठिकाणी वाहून गेलेल्या जागेत दगड टाकण्याचे काम सुरु केले आहे.

पंधरामाड ते आलावा या साडेतीन किलोमिटरच्या किनारी भागात राज्य शासनाने सुमारे 269 कोटींचा बंधारा मंजूर केला. पत्तन विभागाच्या अधिपत्याखाली या बंधार्‍याचे काम होणार आहे. सुमारे पाच महिन्यांपुर्वी या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर काम संथ गतीने सुरु होते. बंधारा उभारला जाणार नसल्याने पावसाळ्यात धोका पोचू नये यासाठी सात ठिकाणी दगड टाकून समुद्राच्या लाटा रोखण्याचे काम हाती घेण्यात आले; मात्र त्यातील सर्वात धोक्याचा भाग असलेल्या अलावा-शेट्येवाडी जवळ दुरुस्तीचे काम केलेले नाही. तेथे समुद्राच्या लाटांमुळे भगदाड पडले आहे. पत्तन विभागाच्या सर्व्हेमध्ये पंधरामाड 1, भाटमिर्‍या 3, जाकिमिर्‍या 2 आणि आलावा 2 अशी सात ठीकाणे होती. आलावा येथील भगदाड ठेकेदाराने तसेच ठेवले. पत्तन विभागाने बंधार्‍याला पडलेले भगदाड भरुन काढण्याची सुचना देवून तेथील काम पुर्ण करुन घेणे अपेक्षित असतानाही तलाठ्यांच्या सहीने ग्रामस्थांनाच सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटीसा बजावण्या आल्या. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात होती. पतन विभागाच्या अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून याबाबत जाब विचारण्यात आला होता. ग्रामस्थांच्या नाराजीची गंभीर दखल घेत प्रशासनाकडून शेट्येवाडीत बंधार्‍याला पडलेले भगदाड बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दगड टाकून लाटांचे पाणी रोखले जाणार आहे. सुरक्षेचे काम सुरु केल्यामुळे समाधान व्यक्त केले जात असले तरीही तात्पुरते टाकलेले दगड किती काळ तग धरणार याबाबत साशंकता आहे.