जिल्ह्यात 9 हजार 424 ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ 

रत्नागिरी:-अवकाळी पावसाचा मारा सतत सुरुच असल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाईची तिव्रता मे महिन्यात कमी आहे. पाच तालुक्यातील ५२ गावातील ८१ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून ९ हजार ४२४ जणांना आधार मिळत आहे.

जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक उष्म्याची नोंद झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पारा वर चढत गेला. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस लांबला होता. त्यानंतर प्रत्येक महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी नद्या, नाले यासह पाणी पुरवठा करणार्‍या स्रोतांमध्ये पुरसे पाणी होते. छोट्या वहाळांमध्येही पाणी साचून राहिल्याने किनारी भागातील विहिरींची पाणीपातळी स्थिर होती. त्यामुळे डोंगराळ भागात राहणार्‍या गावांमध्येच टंचाईची तिव्रता जाणवत आहे. रत्नागिरी, राजापूर, गुहागर आणि दापोली या चार तालुक्यात एकही पाण्याचा टँकर धावलेला नाही; मात्र उर्वरित पाच तालुक्यातील ९ हजार ४२४ लोकांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत ३ शासकीय आणि ५ खासगी अशा आठ टँकरने ४६९ फेर्‍यांनी पाणी पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात गतवर्षी ५९ गावातील १०० वाड्यांना  १३ टँकरने पाणी दिले जात होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईची तिव्रता कमी झाली आहे.