प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर 

रत्नागिरी:- महा आवास अभियान २०२०-२१ प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यस्तरावर सर्वात्कृष्ट काम करणार्‍या जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीला द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे. विशेष अभियानांतर्गत राज्यस्तरावरुन दिलेल्या उद्दीष्टामधील ५ हजार ०१२ घरे पूर्ण केली. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत दररोज तालुकास्तरावरुन आढावा घेतला जात होता. येणार्‍या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

राज्य शासन पुरुस्कृत योजनेंतर्गत रमाई आणि शबरी आवास योजनेतील घरांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी २० नोव्हेंबर २०१९ ते ५ जुन २०२१ या कालावधीसाठी महा आवास अभियान राबविण्यात आले होते. शासनाने प्रत्येक जिल्ह्याला उद्दीष्ट निश्‍चित करुन दिले होते. रत्नागिरी जिल्ह्याला ५ हजार ८६३ प्रस्ताव पूर्ण करावयाचे होते. त्यातील पहिला हप्ता ५ हजार ८४२ जणांच्या बँक खात्यात सुपूर्द केले असून ५ हजार ०१२ घरे बांधून झाली आहेत. ८५१ घरांचे कामे प्रगतीपथावर आहेत. महा आवास अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात अहमदनगर जिल्ह्याने प्रथम तर रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले. पुरस्कार वितरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल.

ग्रामीण विकास यंत्रणेेेने जिल्ह्याला मिळालेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नियमित आढावा घेण्यास सुरवात केला होता. कामाची स्थिती, कोणत्या अडचणी येतात, आवश्यक साहित्य किंवा कुशल कामगारांची स्थिती यावर भर दिला. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणा पोचली आणि त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला. मंजुर झालेल्या घराचा परिपुर्ण प्रस्तावात जातीचा दाखल मिळवणे कठीण जात होते. ही बाबत लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, प्रकल्प संचालक एन. बी. घाणेकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. त्यामुळे उपविभागियस्तरावर लवकरात लवकर दाखले मिळण्यास सुरुवात झाली. वाळू, चिरे व मातीवर आकारण्यात येणारी रॉयल्टी लाभार्थ्यासाठी अडचणीची ठरली होती. ती माफ करण्यासाठी प्रशासन सरसावले. गटविकास अधिकार्‍यांनी यामध्ये मोलाची भुमिका बजावली. घर बांधण्यासाठीच्या साहित्याचा तुटवडा भासू नये यासाठीही यंत्रणेकडून लक्ष ठेवण्यात आले. त्यामुळे बांधकाम सुरु केल्यानंतर तिन ते चार महिन्यांमध्ये घरं उभी राहीली. भुमिहीनांना जागा देणे, गृह संकुल उभारणे, उद्दीष्टात १०० टक्के मंजूरी मिळवणे, पहिला हप्ता त्वरीत देणे, भौतीक व आर्थिकदृष्ट्या घरकुलं पूर्ण करणे, गवंडी प्रशिक्षण घेणे, जिल्हा व तालुकास्तरावर डेमो हाऊसेस बांधणे, शासकीय योजनांचा संमन्वय साधणे, नाविन्य उपक्रमांवर भर देणे या दहा सुत्रांचा वापर करणे.