राजापूरात टेम्पोने दुचाकीला चिरडले; दोघांचा मृत्यू

अपघातानंतर पळणाऱ्या टेम्पोची एसटी बसला धडक

राजापूर:- गुरुवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास लांजा येथे दुचाकी घसरून पावस येथील 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पाचच्या सुमारास राजापूरात अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पोने दुचाकीला चिरडले असून दुचाकीवरील दोघेजण ठार झाले आहेत. लांजा- राजापुरात एकाच दिवसात 3 अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे कुंभारवाडी येथे हा अपघात झाला. बाजीराव डोंगळे (सुमारे 52, रा.हातिवले) व विजय हरेश्वर शिंदे (सु. 45, खडपेवाडी, राजापूर) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. गुरूवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.  

 पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकीवरून हातिवले येथून राजापूरला जात होते. ते कुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता कंटेनरला ओव्हरटेक करताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी टेम्पोच्या चाकाखाली जाऊन सुमारे 100 फुटे पुढे फरफटत गेली. दुचाकीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. यामध्ये दुचाकीवरील दोघेही टेम्पोखाली चिरडून रक्तबंबाळ अवस्थेत मृत्युमुखी पडले.

 दुचाकीला धडक दिल्यानंतर या टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र एसटीचे नुकसान झाले आहे. आयशर टेम्पो सिंधुदुर्गातून खेड येथे जात होता. या अपघाताची खबर मिळताच पोलिसांसह अनेकांनी घटना स्थळी धाव घेतली. खासगी रूग्णवाहीकेने दोघांचेही मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

अपघातात दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या टेम्पो चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.