राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

मुंबई:- गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर स्थगिती मिळाली आहे. कर्मचारी संघटनेने याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली. वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही हे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे संप स्थगित करत असल्याचं वीज कर्मचारी संघर्ष समितीचे मोहन शर्मा यांनी म्हटलं.

या बैठकीनंतर मोहन शर्मा म्हणाले की, ऊर्जामंत्र्यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिले आहे. पुढील ३-४ दिवसांत यावर कारवाई होईल. संपात सहभागी झालेल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही. बदली धोरणासंदर्भात एकतर्फी निर्णयावर विस्तृत निवेदन देतील. हायड्रोपॉवर स्टेशन खासगी कंपन्यांना देण्याबाबत चर्चा झाली. चर्चा केल्याशिवाय बदली धोरण राबवणार नाही. कंत्राटी कामगारांना संरक्षण दिले जाईल. नोकरी भरतीत कंत्राटी कामगारांना संरक्षण द्यावं. २००३ च्या अमेंडमेंड बील राज्यानं केंद्राला कळवलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपानं केली होती नितीन राऊतांवर टीका

Qज्या खात्यात सुसंवाद राखला जातो, तेथे कर्मचारी संघटना संप पुकारण्याचा विचार करत नाहीत. राज्यात पुकारण्यात आलेला संप अचानक प्रारंभ झालेला नसून, कर्मचारी संघटनानी दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस दिली होती. पण त्यांच्याशी वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलाही संवाद साधला नाही. आता कर्मचारी रस्त्यावर उतरल्यानंतर ऊर्जा मंत्रालयाला जाग येत असेल तर हे दुर्दैवी अशा शब्दात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री नितीन राऊतांवर टीकास्त्र सोडलं होतं.