रत्नागिरीत घरपट्टी थकवणाऱ्या ४७ प्रॉपर्टी सील

रत्नागिरी पालिकेची कारवाई; साडेसहा कोटी वसुलीचे उद्दिष्ट





रत्नागिरी:- आर्थिक वर्ष संपत आल्याने पालिकेच्या वसुली पथकाने थकबाकीधारकांना दणका दिला आहे. घरपट्टी थकवणाऱ्या शहरातील ४७ मालमत्ता पालिकेने सील केल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल टॉवर, मंगल कार्यालय, इमले आणि नॉन बॅंकिंग कंपन्यांच्या काही कार्यालयांचा समावेश आहे.  पालिकेपुढे अजूनही साडेसहा कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पालिकेची कारवाई टाळण्यासाठी इमलेधारकांनी लवकरात लवकर घरपट्टी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.


रत्नागिरी पालिकेची दरवर्षी सुमारे २८ हजार इमलेधारकांकडून सुमारे ७ कोटीची घरपट्टी वसुली होते; मात्र कोरोना काळामुळे घरपट्टी थकबाकी १४ कोटीवर गेली होती. यापूर्वी पालिकेने अनेक सवलती दिल्या होत्या; मात्र आता पालिकेने घरपट्टी थकबाकीविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. निम्मा मार्च महिना संपला असून आर्थिक वर्ष अखेर जवळ आले आहे. त्यामुळे पालिकने थकबाकीधारकांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. ५५ टक्के थकबाकी वसूल झाली असून, उर्वरित साडेसहा कोटी रुपयांचे मोठे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. थकबाकीदार असलेल्या शासकीय कार्यालयांना यापूर्वीच रेडकार्ड देण्यात आली आहेत. त्यांच्याकडून सुमारे ६६ लाख ५० हजार रुपये येणे बाकी आहे.  

शहरातील मालमत्ताधारकांना नोटिसा देऊनही त्यांनी घरपट्टी न भरल्याने पालिकेच्या वसुली पथकाने थकबाकीधारकांना झटका दिला आहे.

आतापर्यंत ४७ मालमत्ता पालिकेने सील केल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये येणे बाकी आहे. यामध्ये नाचणे रोड येथील मंगळवार आठवडा बाजार येथील ए. टी. सी. इंडिया या कंपनीचा मोबाईल टॉवर सील केला आहे. तसेच एका मंगल कार्यालयाचा समावेश आहे. संचयनी, निसर्ग फॉरेस्ट, काही ब्लॉक, सदनिका अशा ४७ प्रॉपर्टी पालिकेच्या मालमत्ता विभागाने सील केल्या आहेत. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाचे अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, अभियंता शिवचर आदींचा समावेश आहे.