खेडमध्ये 29 वर्षीय तरुणावर 8 जणांकडून प्राणघातक हल्ला

 खेड:- खेड तालुक्यात एका तरुणावर रात्रीच्या सुमारास जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. लोटे तलारीवाडी येथील अविनाश चाळके या सामाजिक कार्यकर्त्यावर शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मोरवंडे येथील आबाचा ढाबा या ठिकाणी सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाळके गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरा त्यांनी याबाबत खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

 अविनाश संतोष चाळके (वय 29 रा. पिरलोटे विठ्ठलवाडी) हे शुक्रवारी रात्री 10.30 वा. च्या सुमारास मित्र प्रभु रमण चव्हाण (31 वर्षे, सध्या रा. लोटे, तलारीवाटी ता. खेड रा. अहीरौली, देवरीया राज्य उत्तरप्रदेश) याच्यासोबत मोरवंडे येथील आबाचा ढाबा येथे जेवणासाठी गेले होते. गप्पा मारत असताना तेथे 7 ते 8 आले.  दोघांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अविनाश व प्रभु चव्हाण हॉटेलच्या पाठीमागील बाजूने अंधारात जीव वाचवण्यासाठी पळून गेले. त्यानंतर अविनाश चाळके याने पोलिस नियंत्रण कक्ष रत्नागिरी यांना फोनवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.