सिंधुरत्न योजनेतून जिल्ह्याला दरवर्षी 50 कोटींचा निधी: उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी:- रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यांच्या विकासासाठी सिंधूरत्न योजनेतून 300 कोटी रुपयांचा निधी पुढील तीन वर्षांसाठी मंजूर केला आहे. प्रत्येक वर्षी रत्नागिरी जिल्ह्याला 50 कोटी रुपये विशेष निधी मिळेल. या पध्दतीने महाविकास आघाडी कोकणाला या माध्यमातून कोकणातील नैसर्गिक साधनांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटन, मत्स्य संवर्धन, स्थानिकांना रोजगार आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. रत्नागिरी तसेच कोकणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला.

 रत्नागिरीच्या जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या विस्तारीकरण बांधकामाचा भूमीपूजन सोहळा आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर आदी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
     

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, समक्ष येऊन भूमीपूजन करण्यास आवडले असते. मात्र, अधिवेशनामुळे येता आले नाही. जिल्हा परिषदेच्या या विस्तारीत इमारतीचा आराखडा चांगला केला आहे. ग्रीन बिल्डिंग, सौर ऊर्जा आदींचा यात समावेश आहे. प्रत्येक शासकीय वस्तू देखणी, आकर्षक, शहराचे सौंदर्य वाढविणारी असेल, याची काळजी आम्ही घेत असतो. इमारतीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना काम करताना उत्साह वाटला पाहिजे, कामासाठी येणार्‍या लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनाही इमारतीत आल्यावर चांगले वाटले पाहिजे, त्यासाठी ही इमारत हवेशीर, चांगला उजेड असणारी असावी. जिल्हा परिषदेची ही इमारत वेळेत पूर्ण झाली पाहिजे व त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे. ही इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालणारी असली पाहिजे, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.
   

रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. तिथे प्रशासक आले आहेत. जिल्हा परिषदेचीही मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी काम पाहणार आहेत. त्यांनी चांगले काम केले पाहिजे. शासनात प्रशासनात काम करत असताना लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांनी असं काम केले पाहिजे की, लोकांनी त्यांचे नाव काढले पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.  
   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार म्हणून कोकणला भरभरून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. या अर्थसंकल्पात देखील कोकणला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरीतील मिर्‍या किनार्‍यावर धूप प्रतिबंधक बंधारा, विमानतळासाठी निधी, जिल्हा परिषदेच्या विस्तारीत इमारतीसाठी निधी, पोलिसांसाठी, कृषी योजनांसाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील बहुतेक आश्वासने पूर्ण केली आहेत. येणार्‍या काळात कोकणच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय घेणार आहोत. रत्नागिरी ते गणपतीपुळे या सागरी मार्गावर जेटबोट, रत्नागिरी विमानतळ इमारत व भूसंपादनासाठी 100 कोटी, कोकणातील सर्वोकृष्ट क्रीडा संकुल रत्नागिरीत बांधण्याचा प्रयत्न आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कसबा इथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी दीड कोटी निधी प्रस्तावित आहे. यासह विविध उपक्रमासाठीही निधी देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.
   

कोकणातील निसर्गाचे संवर्धन करून निर्सगपूरक उद्योग उभारायचे आहेत. सर्वांना सोबत घेऊनच कोकणचा विकास करीत आहोत. रत्नागिरीसह कोकणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
     

रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. परब म्हणाले की, पालकमंत्री म्हणून या इमारतीच्या कामांमध्ये कुठेही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. ही जिल्हा परिषदेची इमारत राज्यात आदर्शवत इमारत ठरेल. तिला जिल्ह्यात मानाचे स्थान असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
   

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या शासकीय इमारतीचे काम चांगले होईल यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ग्रामविकास विभागामाफत आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. सामान्य जनतेचे काम या इमारतीमधून उत्तम प्रकारे होईल असा विश्वास आहे.
     

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील विकासात्मक चांगल्या कामासाठी आपण पाठीशी आहोत. ही इमारत पूर्ण करून आदर्शवत होणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटनाच्या विकासातून जिल्ह्याचा अधिक विकास साधून चांगल्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील.  राज्यासाठी जिल्हा परिषदेची ही इमारत आदर्श असेल. जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची डागडुजी, पोलीस विभाग इमारत, जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीसाठीही निधी देण्यात येणार आहे.
   

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी प्रस्ताविकामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारत विस्तारीकरणाची गरज, त्यासाठी केलेला पाठपुरावा, सर्वांकडून झालेली मदत, होणारी इमारत याबाबतची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, योगेश कदम हे देखील यावेळी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमास उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम सभापती उदय बने, राजन साळवी, अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत मंचेकर, समाजकल्याण सभापती परशुराम कदम, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर, कृषी, पशुसंवर्धन समिती सभापती रेश्मा झगडे आदी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.