तालुकास्तरावर होणार वीजबिल दुरुस्ती शिबिर

महावितरणचा उपक्रम; कृषी ग्राहकांसाठी विशेष आयोजन

रत्नागिरी:- कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फ़े उद्या (ता. १०) पासून राज्यातील प्रत्येक तालुक्यात वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कृषी ग्राहकांच्या देयक दुरुस्ती संदर्भात शिबिरे होणार आहेत. या शिबिरांमध्ये ग्राहकांचा मंजूर वीजभार, मिटर वाचन, थकबाकी या स्वरुपाच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.  सप्टेंबर २०२० अखेर राज्यातील कृषी ग्राहकांकडे ४५,८०२ कोटी थकबाकी आहे.

कृषी ग्राहकांच्या वीज देयक दुरुस्ती व मंजूरीचे प्रस्ताव महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे मंजूर करून देयक दुरुस्तीनंतरची सुधारित थकबाकीची रक्कम ग्राहकाला तात्काळ कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या एकूण थकबाकीपैकी सप्टेंबर २०२० अखेर कृषी ग्राहकांकडे ४५,८०२ कोटी थकबाकी झालेली आहे. त्यामुळे कृषी ग्राहकांच्या हितासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व समावेश “कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२०” जाहीर केले होते. या धोरणा अंतर्गत निर्लेखनाद्वारे १०,४२० कोटी सूट, व्याज व विलंब आकारामध्ये ४,६७६ कोटी सूट दिल्यानंतर सुधारित थकबाकी ३०,७०६ कोटी निर्धारित करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त २,३७८ कोटी रक्कमेचा भरणा कृषी ग्राहकांद्वारे करण्यात आलेला आहे.
सप्टेंबर २०२० पासून चालू वीज देयकाच्या थकबाकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आजपर्यंत एकूण थकबाकी ३९,९९३ कोटी झाली आहे. य़ा योजनेस अपेक्षित प्रतिसाद प्राप्त झाला नसून यामध्ये चुकीच्या देयकांचा मुद्दा वारंवार लोकप्रतिनिधी, ग्राहक प्रतिनिधी व प्रसारमाध्यमातून उपस्थित केला जातो. याबाबत महावितरणतर्फ़े कृषी ग्राहकांच्या देयकांची पडताळणी व दुरुस्ती करण्याबाबत तालुकानिहाय  शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराचा लाभ घेत कृषी ग्राहकांनी आपली वीजबिले तात्काळ  दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.