समाजकल्याण समिती सभेत ‘प्रभारींच्या’ कामकाजावरून गदारोळ 

रत्नागिरी:- मागील पंधरा दिवसात विविध विकासकामांच्या फाईलवर सह्या न करणार्‍या प्रभारी अधिकार्‍यांवरुन जिल्हा परिषद समाजकल्याण समिती सभा चांगलीच गाजली. सभेला उशिरा आलेल्या संबंधित अधिकार्‍यांनेही लेखी सुचनांची मागणी केल्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे त्या प्रभारीची तक्रार करत पदभार काढून घेण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एका अधिकार्‍याचा पदभार समितीमध्ये काढून घेण्यात आला, अशी माहिती सभापती परशुराम कदम यांनी दिली.

सभापती कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी संतोष थेराडे, दिपक नागले, विनोद झगडे, सुनील तोडणकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जिल्हा परिषद समाजकल्याणचा पदभार जिल्हा समाजकल्याण अधिकारी चिकणेंकडे देण्यात आला आहे. मंगळवारी (ता. 15) आयोजित सभेला प्रभारी अधिकारी जिल्हापरिषदेत उशिरा आले. त्यांच्याकडून कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. यावरुन सदस्यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत सभापती, सदस्यांचा हा अवमान असल्याचे सभागृहात मत मांडले. मार्च अखेर आणि पंचवार्षिक मुदत संपत आल्यामुळे सदस्य शेवटच्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यावर अधिकार्‍यांकडून वेळीच सह्या होत नसल्यामुळे कामे करता येत नाहीत अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. चिकणे यांनी सदस्यांकडेच लेखी माहीतीची मागणी केली होती. हा एकप्रकारे सदस्यांचा अवमान आहे असेही मत सदस्यांनी मांडले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री. यादव यांच्याकडे प्रभारींची तक्रार केली. सभा चालू असतानाच चिकणे यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला. तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्याकडे पदभार देण्याच्या सुचनाही केल्या.