रत्नागिरी जिल्ह्यात अवेळी पाऊस

रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पावसाने हजेरी लावली. रविवारी पहाटे सलग दोन तास पडलेल्या पावसाने हापूस बागायतदारांना फटका बसला आहे. पावसामुळे कैरीची गळ झाली असून मोहोरही बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पावसानंतर दिवसभर वेगवान वारे वाहत असून हवेत प्रचंड गारवा होता.

शनिवारी (ता. 8) दिवसभर आकाश निरभ्र होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीत हलका शिडकावा झाला. त्यानंतर मध्यरात्री जोरदार पावसाला सुरवात झाली. रविवारी सकाळी सुमारे दोन तासाहून अधिक काळ पावसाने चांगला दणका दिला. मोसमी पावसाप्रमाणेच सरींमध्ये जोर होता. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. कच्चे रस्ते चिखलमय झाले होते. त्यामधून वाहने हाकणेही जिकीरीचे झाले. रविवारी सकाळी काही काळ मळभी वातावरण होते. दिवसभर वेगवान वारेही वाहत होते. दिवसभरात कमाल तापमान 27 अंश तर किमान तापमान 18 ते 20 अंश सेस्लिअसच्या दरम्यान होते. हवेत प्रचंड गारवा जाणवत होता. मुंबई-गोवा महामार्गावर काम सुरु असलेल्या ठिकाणी रस्ते निसरडे झाले होते.
अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकावर झाला आहे. अवकाळीमुळे औषध फवारणीचा हात वाढणार असून आर्थिक भुर्दंड आंबा बागायतदारांना बसणार आहे. मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे. कैरीच्या देठाजवळ काळे डाग पडतात आणि कैरीची गळ होते. रविवारी पडलेल्या पावसाला वेग होता असल्यामुळे कणीसह कैरी गळून गेली. जी कैरी पानाखाली होती, ती वाचली. हे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले आहे. रविवारी दिवसभर उन पडले होते, मात्र पुन्हा पाऊस पडला तर बागायतदारांवर संक्रात निर्माण होण्याची शक्यता आहे.