सात वर्षात साडेचार हजार शेतकरी मँगोनेट प्रणालीवर

रत्नागिरी:- हापूसच्या परदेशातील निर्यातीला चालना देण्यासाठी मँगोनेट प्रणाली विकसित केली आहे. गेल्या काही वर्षात याला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. गतवर्षी जिल्ह्यातील ९३७ शेतकर्‍यांनी नव्याने नोंदणी केली होती तर आतापर्यंत सात वर्षात ४ हजार ५६६ शेतकरी मँगोनेटवर जोडले गेले आहेत. यावर्षीही नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणच्या हापूसला चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे मँगोनेट सुविधा ग्रेप्सनेटप्रमाणे सुरू करण्यात आली. ग्रेप्सनेटच्या माध्यमातून द्राक्षांची परदेशात निर्यात केली जाते. या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी मँगोनेट’ चा पर्याय सात वर्षापूर्वी निवडण्यात आला. नोंदणी दरम्यान बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छूक आहे. त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार कोकणातील हापूस पिकवला जात असल्याने दर्जेदार हापूसचे उत्पादन घेण्यात येते.

२०१४-१५ पासून मँगोनेट सुविधा सुरू करण्यात आली. तर दरवर्षी नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करण्यात येते. मँगोनेटला शेतकर्‍यांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मँगोनेटतंर्गत ४ हजार ५६६ शेतकर्‍यांनी नोंदणी केली असून या शेतकर्‍यांना दरवर्षी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे क्रमप्राप्त आहे. याबाबत जिल्हा कृषी अधिक्षक सुनंदा कुर्‍हाडे म्हणाल्या की  गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्यातीवर परिणाम झाला होता. परंतु यापूर्वी मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात करण्यात आला आहे. युरोप, जपान, अमेरिका येथील व्यावसायिकांनी रत्नागिरीतील काही शेतकजयांच्या बागेत जाऊन पाहणी करून आंब्याची मागणी केली होती. त्यामुळे येथील बागायतदारांना चांगला दर मिळाला होता. यावर्षीही मँगोनेटतंर्गत जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी.