वाटद खंडाळा येथे आंबा बागेला आग लागून लाखोंचे नुकसान

खंडाळा:-वाटद खंडाळा येथे दिनांक 31 डिसेंबर रोजी दुपारी शिक्षक कॉलनीच्या समोरील आंबा बागेमध्ये गवाताला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आग लागल्यानंतर क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. परीसरातील ग्रामस्थांनी ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे ही आग विझवणे शक्य झाले नाही.

या आगीमध्ये मोहर अवस्थेत असलेली सुमारे 500 कलमे होरपळून गेली. आग लागल्यानंतर काही वेळाने जे.एस.डब्लू एनर्जीच्या फायरब्रिगेडला आग लागल्याचे समजताच जेएसडब्लूची फायरब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल झाली. फायरमॅन अक्षय पवार, अभिजीत पाटील, श्लोक हतचे, सुहास चव्हाण, रोहित डोडमणी यांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे बागेच्या जवळच असणार्‍या वस्तीमध्ये होणारी हानी टळली.
प्रशासनाने झालेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वाटद खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्त्ते उमेश रहाटे यांनी केली आहे.