हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी:- हिवताप विभागातील कर्मचाऱयांसाठी शासनाने निर्गमित केलेली अधिसूचना निर्गमित तारखेपासून लागू झाली आहे. या अधिसूचनेत सुधारणा व्हावी या मागणीची दखल न घेण्यात आल्याने आज 14 डिसेंबरपासून ‘लेखणीबंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.  

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिपत्त्याखालील आयुक्त सेवा संचलनालयाचे नियंत्रणातील हिवताप विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, बहुविध आरोग्य सहाय्यक व क्षेत्र कर्मचाऱ्यांचे पदोन्नती साखळीतील पदाची अस्थित्वात असलेली शैक्षणिक पात्रता शासनाने 29-9-2021 च्या अधिसूचनेनुसार वाढविली. अधिसूचना निर्गमित तारखेपासून लागू झाली असल्याने पदोन्नतीस पात्र कर्मचारी वरिष्ट पदावरील पदोन्नतीपासून वंचित झाले. थ्यामुळे हिवताप योजनेतील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांत प्रचंड असंतोषाची लाट निर्माण झालेली आहे.    

याबाबत वेळोवेळी संघटनेकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. अद्याप कोणताही सकारात्मक विचार शासनाकडून झालेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून शासन, प्रशासन भुलथापा देत आहे. त्यामुळे मागण्यांच्या पुर्ततेसाठी 30 नोव्हेंबर रोजी पस्तावित मागण्यांवर लक्ष वेधण्यासाठी राज्यभर कर्मचारी आंदोलन केलेले होते. रत्नागिरी जिल्हा राज्य हिवताप निर्मुलन कर्मचारी संघटनेने जिल्ह्याचे हिवताप अधिकारी कार्यालयासमोर शासनाचे धोरणाचा निषेध नोंदवून आकोश आंदोलन केले होते. या आंदोलनानंतरही संघटनेच्या मागणीची योग्य दखल न घेतल्यामुळे 14 डिसेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डी.डी.कदम व सरचिटणीस एस.एस.कांबळे यांनी सांगितले.