परदेशातुन आलेल्या 935 पैकी 72 जणांचा शोध सुरू 

रत्नागिरी:- दुबई, ओमान, कुवेतसह अन्य देशांमधून आलेल्यांमध्ये 110 जणांची भर पडली आहे. परेदशातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्यांची एकुण संख्या 935 वर पोचली आहे. ओमीक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सुरक्षेसाठी संबंधितांची आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत असून अद्याप परदेशातून आलेल्यांपैकी एकहीजण पॉझिटिव्ह सापडलेला नाही. 

ओमीक्रॉनचा भारतामध्ये शिरकाव झाल्यानंतर राज्य शासनाकडून सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. परदेशामधून आलेल्यांची यादी विमानतळावरुन जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेकडे पाठविण्यात आली होती.  सोमवारी परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये 110 जणांची भर पडली असून आणखीन काही परदेशी लोकं गावाकडे परत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोग्य विभागाच्या सुचनेनुसार प्राप्त यादीतील सर्वांशी संपर्क झाला आहे. नव्याने दाखल 110 पैकी 32 जणांची आरटीपीसीआर चाचणी विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी झाली असून अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 260 जणांची चाचणी करण्यात आली आहे.  त्यांच्यापैकी कुणालाही लक्षणे नसल्याने सध्या त्यांना घरीच राहण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यांच्यावर आठ दिवस आरोग्य यंत्रणेचे लक्ष राहणार आहे. आठ दिवसांनी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांना बाहेर फिरण्यास मोकळीक दिली जाणार आहे. जिल्ह्यात आलेल्यांपैकी सर्वाधिक चिपळूण तालुक्यातील 232 तर रत्नागिरी तालुक्यातील  207 जण आहेत. दापोली 128, खेड 186, गुहागर 15, संगमेश्वर 59, लांजा 18, राजापूर 27 तर जिल्ह्याबाहेरील 21 जण आहेत. यातील 72 जणांचा शोध सुरू असून यातील 20 जण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.