कोरोनाने मृत्यू; नातेवाईकांना सानुग्रह मदतीसाठी ऑनलाईन अर्जासाठी संकेतस्थळ विकसित

रत्नागिरी:- कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता यावे याकरिता राज्य शासनाने वेब पोर्टल विकसीत केले असून अर्जदाराने mahacovid19relief.in वर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकास ५० हजार रुपये सानुग्रह सहाय्य देण्याबाबत महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने २६ नोव्हेंबर २०२१ रोजी शासन निर्णय जाहिर केला. त्यानुसार ऑनलाईन वेब पोर्टल विकसित केले असून त्याद्वारे कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉग इन करणे आवश्यक आहे. https://epassmsdma.mahait.org/login.htm  यावर देखील लिंक देण्यात आली आहे. 

अर्ज करताना अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे अर्जदाराचा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉग इन करता येईल.
कोरोनामुळे मृत्यू झाला अशी केंद्र शासनाकडे ज्यांची नोंद झाली असेल अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोरोना मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ट्यर्थ कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागतील. 

जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास जिल्हा, नगर पालिका स्तरावर गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देण्याचे अधिकार असतील.
अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधारसंलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक02352 – 226060 आणि 222233 वर संपर्क साधावा.