गणेशोत्सवात कोरेकडून अडीच लाख प्रवाशांची वाहतूक; साडेसात कोटीचे उत्पन्न 

योग्य नियोजन करत कोकण रेल्वेची कौतुकास्पद कामगिरी 

रत्नागिरी:- कोरोनाच्या काळात श्रमिक स्पेशलच्या माध्यमातून महत्वाची कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेने गणेशोत्सवातहि लाखो भाविकांची सुखरूप ने- आण करत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात तब्बल 2 लाख 40 हजाराहून अधिक भाविकांची कोकण रेल्वेने ने-आण केली. या वाहतुकीतुन कोकण रेल्वेने 7 कोटी 72 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. आपल्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक बिघडू न देता सलग 20 दिवसातील 250 हुन अधिक जादा गाड्यांच्या फेऱ्यांचे हे नियोजन कोकण रेल्वेच्या कर्मचारीअधिकाऱ्यांनी चोवीस तास सलग काम करत यशस्वी केलं आहे.

कोरोनाच्या काळात कोकण रेल्वेने कोकणातील श्रमिकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवण्याची जवाबदारी यशस्वीपणे  पार पडल्यामुळे कोकण रेल्वेने त्यावेळी केलेल्या नियोजनाचे कौतुक झाले  होते. आता गणेशोत्सवातही कोकणरेल्वेने महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने कोकणात येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाच्या नियोजनाबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली असताना कोकण रेल्वेने नेटकं निजोजन करत मुंबईतून कोकणातील गावागावात आणि उत्सवाच्या सांगतेनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर बनवला.
 

गणेशोत्वासाठी कोकण रेल्वेने टप्याटप्याने नियोजन करत कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी स्पेशल गाड्यांची घोषणा केली. पहिल्या टप्यात जाहीर झालेल्या गाड्या तात्काळ आरक्षित होताच चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी अधिकच्या स्पेशल गाड्यांची घोषणा करण्यात आली . उत्सवाच्या दोन दिवस आधीपासून उत्सवाच्या सांगातेपर्यंत कोकण रेल्वेने मार्गावर तब्बल 256 गाड्यांचे नियोजन केले . नियमित मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सांभाळत अधिकच्या 256 फेऱ्या मार्गावरून नेणे सोपे नव्हते पण हे आव्हान कोकण रेल्वेच्या कामगार अभियंता आणि अधिकाऱ्यानी  या काळात आपल्या घरात उत्सव  असताना  अहोरात्र काम करत यशस्वी केले . या काळात तब्बल २ लाख 43 हजार 376 चाकरमान्यांनी या ट्रेन मधून प्रवास केला . यातून 7 कोटी 72 लाख रुपयांचा व्यवसाय कोकण रेल्वेने केला.

या संपूर्ण काळात कोठेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली नाही. कोव्हीड च्या सर्व नियमांची अंमलबजावणी करत प्रवाशांची ने-आण करण्यात आली . गणेशोत्सवापूर्वी आधी युद्ध पातळीवर काम करत कोकण रेल्वेने वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करून घेतले. याचा फायदा गणेशोत्वाच्या काळात झाल्या. कोकण रेल्वे  ने केलेल्या योग्य नियोजनामुळे या काळात कोणत्याच गाड्या मार्गावर रखडल्या नाहीत आणि चाकरमानी वेळेत आपल्या नियोजित ठिकाणी पोहोचला. परतीच्या प्रवासात हि बोगीचे  दरवाजे न उघडल्याने होणारे गोंधळ; कोकण रेल्वेने त्याचे हि नियोजन योग्य पद्धतीने केल्याने टळले .कोकण रेल्वेने वेळोवेळी केलेली वेळापत्रके लोकांपर्यंत पोहोचण्यात माध्यमांनी मोठं सहकार्य केले.जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी महिनाभरा आधीपासून नियोजन केल्याने आरोग्य तपासणी आणि वाहतूक नियमनाची कामे सोपी झाली. या करीता कोकण रेल्वेने सहकार्य करणाऱ्या या सर्व यंत्रणांचे आभार मानले. कोकण रेल्वेच्या सर्वच स्तरावरील कर्मचारी आधिकारी यांच्यासह  आर पी एफ ,स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संपूर्ण सहकार्य केल्याने हे नियोजन यशस्वी झाले अशा भावना कोकण रेल्वे कडून  व्यक्त करण्यात आल्या आहेत.