संस्कृत भाषेतील ज्ञान, संस्कार मनावर बिंबवले पाहिजेत

उद्धव ठाकरे ; कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे उदघाटन

रत्नागिरी:- संस्कृत भाषा नाहीशी होत चालली आहे. गुण मिळवण्याचा विषय म्हणून संस्कृत विषयाकडे पाहिले जाते. परंतू त्यापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपली  आणि मनामनात जागवली गेली पाहिजे. तरच आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील. माणुस शिकवणारी भाषमा म्हणजे संस्कृत आहे. त्यामुळे  केवळ भाषांतर किंवा पाठांतरापूरता विचार न करता संस्कृत भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले पाहिजेत, अशी प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

रामटेक येथील कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे ऑनलाईन उद्घाटन उमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,  मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, रामटेकच्या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलसचिव डॉ. हरेकृष्ण अगस्ती, कुलगुरु प्रो. श्रीनिवास वरखेडी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे,  जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आपले वेद वाड:मय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभुत्व नाही मिळवता आले तरी  किमान या भाषेचे किमान ज्ञान आपल्याला असायला हवे. त्यांनी संस्कृत ही अनेक भाषांची जननी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरीमध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचे पाऊल कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल अभिमान वाटतो. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतूक केले. आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे संस्कृत आपल्याला सांगते. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे स्थापन करण्यात आलेल्या संतपीठाचा तसेच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या वन अकादमीचे वन विद्यापीठात रुपांतर करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचा येथे आवर्जून उल्लेख केला. त्यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.