शासकीय योजनेत काम करणाऱ्या प्रत्येक कामगार, कर्मचाऱ्याला दरमहा 21 हजार वेतन द्या 

रत्नागिरी:-शासकीय योजनेत काम करणार्‍या सर्व कामगार आणि कर्मचार्‍यांना दरमहा एकवीस हजार रुपये किमान वेतन द्या, आधाी प्रोत्साहन भत्ता सुरु करा तरच कोविड काळात काम करु, या मागणीसाठी आशा गतप्रवर्तक आरोग्य कर्मचारी (आयटक) कामगार संघटनेतर्फे जिल्ह्यातील 1300 आशा महिलांनी एक दिवसाचा संप केला. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करुन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना निवेदन दिले.

जिल्हा परिषदेसमोर आयटकच्या प्रतिनिधी महिला आंदोलनासाठी उपस्थित होत्या. आशा, गतप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कॉ. शंकर पुजारी, विद्या भालकर, पल्लवी पारकर,  संजीवनी आचरेकर, भारती जाधव, रचना येरपल्ले, रिया धोत्रे, रश्मी कदम, प्राची लाड, सेजल नागले आदी उपस्थित होते.

मागिल पाच महिन्याचे तेरा हजार रुपये मानधन आणि इतर कामावर आधारित मोबदला आठ दिवसांमध्ये द्या, गटप्रवर्तक महीलांचे अठरा हजार चारशे रुपये थकित मानधन आणि इतर रक्कम त्वरीत मिळावी, आरोग्य वर्धनी योजनेची रक्कम थकीत यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. संपातील आशा व गटप्रवर्तक यांच्या बहुसंख्य मागण्या राज्य शासनाशी संबंधित आहेत. ते शासनाकडे पाठवले जाईल असे असे डॉ. आठल्ये यांनी सांगितले.