जिल्हा परिषदेतील पदोन्नत्या रखडल्या

रत्नागिरी:- विविध खात्यामधील पदोन्नतींचे प्रस्ताव रखडल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सामान्य प्रशासन विभाग यावर कधी कार्यवाही करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

प्रशासनामध्ये दरवर्षी विविध पदांवरील कार्यरत पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती दिली जाते. राज्यभरात काही जिल्ह्यांनी पदोन्नतीने पदस्थापना करण्यास सुरवातही केली आहे; परंतु रत्नागिरी जिल्हा परिषदेत त्यावर अजुनही कार्यवाही झालेली नाही. पदोन्नती हा प्रत्येक कर्मचारी, अधिकार्‍यांच्या नोकरीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. निवृत्तीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेले अनेकजणांना याचा लाभ होत असतो. त्यामुळे दरवर्षी होणार्‍या या प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यानुसार गतवर्षीपासून प्रशासन पदोन्नतीचा निर्णय घेईल या अपेक्षेने कर्मचारी प्रतिक्षा करत आहेत. ही प्रक्रिया सामन्य प्रशासन विभागाकडून केली जाते. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया रखडली की काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. गुरुवारी (ता. 1) जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा असल्यामुळे कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.