तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या तयारीवर मुख्यमंत्री समाधानी 

रत्नागिरी:- तिसर्‍या लाटेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात झालेल्या तयारीतबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम झाले अशी प्रतिक्रिया दिली. रत्नागिरी शहरातील तीन ठिकाणच्या बाल कोविड केअर सेंटर आणि महिला रुग्णालय येथील ऑक्सिजन निर्मिती सुविधा याबाबत सादरीकरण दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आले.

अभिनव अशा बाल कोविड केंद्राचे तसेच महिला रुग्णालयातील बालकांसाठीच्या अतिदक्षता कक्ष आणि स्वस्तिक रुग्णालयातील बालरुग्ण सुविधेसह महिला रुग्णालयात असलेल्या ऑक्सीजन निर्मिती संयंत्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याबाबतची एक चित्रफित यावेळी दाखवण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार राजन साळवी, नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी यावेळी जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात सर्व तालुक्यात चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. त्यासोबत आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या खाली आला आहे.

जिल्ह्यात असणार्‍या ऑक्सिजन सुविधेबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या तीन दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आलेला आहे. त्यात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. जिल्ह्यात 840 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.