रस्ते, पाणी योजना, स्टेडियममधील गाळ्यांवरून जोरदार चर्चा

रनप सर्वसाधारण सभा; भाजप-सेना नगरसेवकांमध्ये शाब्दिक जुगलबंदी 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दयनिय अवस्था, नळपाणी योजनेचे रखडलेले काम आणि छत्रपती शिवाजी स्टेडियममधील तीन गाळे फेरनिविदा यावरून रनप सर्वसाधारण सभेत गरमागरम चर्चा झाली. सभेत मारुती मंदिर गाळे प्रकरणावरून सेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक जुगलबंदी झाली. 

रत्नागिरी शहरातील रस्त्यांची फारच दुरावस्था झाली आहे. शहरवासीयांसह वाहनधारकांना त्याचा त्रास होत आहे. नळपाणी योजनेचे काम चार वर्षे होत आली तरी अजून पूर्ण होत नसल्याचे भाजप नगरसेवक राजू तोडणकर, समिर तिवरेकर, मुन्ना चवंडे यांनी सभागृहात सांगितले. यावर पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी शांतपणे उत्तर देवून विरोधकांना शांत केले. नगराध्यक्षांनी सांगितले की, रस्ता डांबरीकरणाची कामे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली. परंतु तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 14 मे पासून पाऊस सुरू झाला. त्यानंतर हा पाऊस पुढे तसाच पडत राहिल्याने रस्त्यांची कामे करता आली नाही. निसर्गापुढे आपण काय करू शकतो का? असा प्रश्नही नगराध्यक्षांनी उपस्थित केला.

नवीन नळपाणी योजनेचे काम वेगाने व्हावे, यासाठी नगर परिषदेने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परंतु कोरोनासारख्या संकटामुळे त्यामध्येही अडथळे निर्माण झाल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. यावर्षी उन्हाळ्यात शहराला पाणी टंचाई जाणवली नाही यावरून आम्ही किती प्रयत्नशील आहोत याचा प्रत्यय येत आहे, असे नगराध्यक्षांनी लक्षात आणून दिले. अजूनही लवकरात लवकर या योजनेचे काम पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्दयाला उत्तर देताना सांगितले. छत्रपती शिवाजी स्टेडियममधील 4, 5, 15 क्रमांकांचे गाळे मागच्या लिलावात मोठ्या रकमेत गेले होते. परंतु ज्यांना हे गाळे मिळाले, त्यांनी त्या गाळ्यांची अधिमूल्य रक्कम (प्रिमियम) ते पैसे भरून ताब्यात घेतले नाहीत.

फेर निविदेत हे गाळे पूर्वीच्या लिलावातील रकमेपेक्षा कमी अधिमूल्य रकमेत गेले. प्रत्येकी 8 लाख 26 हजार 60 रुपयांच्या प्रिमियम रकमेमध्ये या गाळ्यांचा लिलाव झाला. पूर्वी हे गाळे यापेक्षा अधिक रकमेच्या बोलीने गेले होते. यातील एक गाळा 75 लाखाला तर उर्वरित दोन गाळे 20 लाखांपेक्षा अधिक प्रिमियम रकमेत गेला होता. आता ही प्रिमियम रक्कम इतकी कमी कशी झाली? असा सवाल भाजपा नगरसेवकांनी उपस्थित केला. यावर आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांनी फेर निविदेची प्रक्रिया मागील सभेमध्ये झालेल्या ठरावाप्रमाणे झाली असल्याचे आठवण करून दिली.

रत्नागिरी नगर परिषदेच्या शुक्रवारच्या या सर्वसाधारण सभेत भुयारी गटारांच्या कामाचे प्रेझेंटेशन झाले. या कामाचा डिपीआर झाला असून तो सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्चाचा असल्याचे आरोग्य सभापती नायर यांनी सांगितले. हा प्रस्ताव पुढील सर्व मंजूरीसाठी पाठवून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सभापतींनी सांगितले. लायन्स क्लबकडून कागदाच्या मोठी पाकीटे बनवण्यात आली आहेत. सॅनिटरी पॅड या पाकीटात भरून तो घंटागाडीत देता येणार आहे. अशी 1 हजार पाकीटे रनपला देण्यात आली आहेत. ती वॉर्डनिहाय वाटली जाणार असून त्या पाकीटांची अधिकची मागणीही करण्यात आली असल्याचे सभापतींनी सांगितले.

जुन्या बाजारपेठेतील मच्छिमार्केट-झारणी रोडवरील तलावाजवळ मुजावर चाळ आहे. गेल्या रविवारी मुसळधार पाऊस पडत असताना मध्यरात्री येथील पर्‍या आणि चाळीजवळची गटारे तुंबून पाणी बाहेर आले. हे पाणी चाळीतील घरांमध्ये गेले. गटार आणि पर्‍यावर असलेल्या खोक्यांमुळे पर्‍या आणि गटारांची सफाई करता येत नाही. भविष्यात असे पाणी तुंबण्याची घटना घडू नये यासाठी गटार आणि नाल्यावरचे खोके हलवण्याची मागणी करणारे पत्र सेनेचे नगरसेवक विकास पाटील यांनी नगराध्यक्षांना दिले. शहरातील सर्वच ठिकाणी अशी भूमिका घेतली जावी, असे आरोग्य सभापती निमेश नायर यांनी सांगितले.