कोकण रेल्वे मार्गावर 15 जूनपासून धावणार मत्स्यगंधा एक्स्प्रेस

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या 15 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.कोरोनाच्या काळात अनेक रेल्वे गाड्या बंद झाल्या. त्यामध्ये 02619/02620 क्रमांकाच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगलोर सेंट्रल या मार्गावर धावणाऱ्या या गाडीचा समावेश होता. कोरोनाच्या काळात ही गाडी सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल या नावाने धावत आहे. 

गेल्या काही काळापासून बंद असलेली ही गाडी येत्या 15 जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे. मंगलोर ते एलटीटी मार्गावरील 02619 क्रमांकाची गाडी मंगलोर येथून येत्या 15 जून ते 30 जून या कालावधीत दररोज दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल.

परतीच्या मार्गावर 02620 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 16 जून ते एक जुलै या काळात दररोज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी मंगलोर येथे पोहोचेल. या गाड्यांना बावीस डबे असतील. गाडी पूर्णपणे आरक्षित असेल. एलटीटी-मंगलोर मार्गावरील गाडीला माणगाव आणि खेड हे रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अधिक थांबे देण्यात आले आहेत.